Thursday, January 3, 2013


My article on AISI AKSHARE and the thread below. 


अपग्रेड प्रेम

मी वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रेम करत आलो आहे असं म्हणालो तर इतर कुणाच्या आधी मीच ते खोडून काढेन. म्हणजे एका मुलीच्या आणि माझ्या शरीरा-मनामधल्या काही घटना मी प्रेम या एका मोठ्या कॅटेगरीत टाकल्या, त्या वेळेच्या माझ्या भावनांबद्दल असलेल्या माझ्या आताच्या भावना शब्दांनी रि-घडवल्या तरी त्यानी व्याख्येसारखं प्रेम समोर ठेवता तर काही येत नाही. त्यावेळी प्रेम नावाची गोष्ट सिनेमात दिसायची, शरीरातलं प्रेम हे अनोळख्याप्रमाणे स्वतःचं स्वतः मुक्त जगायचं. आणि आता मोठं झाल्यावर या प्रेमाला मी अनुभवण्याची, त्याचे नियम आणि एटीकेट सांभाळण्याची जबाबदारी असते हे कळतंय एवढाच या दोन स्थितींमधला फरक आहे. शाळेत प्रत्येक इयत्तेनुसार हे प्रेम बदलत जायचं तेव्हा मेंदूचा एकेक पीळ मच्युअर झाल्यासारखं वाटायचं. आणि स्वतःच्या बरोबरीनं काही इतर पात्रंसुध्दा प्रेमात बुद्धिबळातल्या सोंगट्यांसारखी कशी पळवावी लागतात याचं शिक्षण मिळायचं. गाण्यांमधून, शिक्षणातून, सिनेमातून, कवितेतून, साहित्यातून आणि जमेल तितक्या सर्व स्रोतांतून भडिमार व्हायचा की जगातली सगळ्यात शाश्वत आणि माणुसकीचा तरणोपाय असलेली गोष्टंय प्रेम. ते मिळतं तेव्हा इतर कशाची गरज उरत नाही. त्याच्यापुढे सगळं काही गौण भासू लागतं. लोक लोकांना फाट्यावर मारतात किंवा कंप्लीटली मारतात किंवा स्वतःला मारतात आणि कोणत्याही पातळीवर जाऊन प्रेम करण्यात यशस्वी होतात. प्रेम हे एक शाश्वत आणि सुखकारी मूल्य आहे या कॉन्स्ट्रक्टलाच धक्का लागलेला मी पाहिला नाही कधी. कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रेमाचं वर्चस्व आपल्या शाश्वतीसुखलोलुप मनांनी मान्य केलेलंच असतं. मी जेव्हा या प्रेमानं मिळणाऱ्या शाश्वतीचा आणि सुखाचा विचार करतो तेव्हा माझ्या मनावर या शाश्वतीसुखाचा कोणताच अक्ष तयार नसतो.
साधारणपणे एकाच प्रकारचं प्रेम अस्तित्वात नसतं याविषयी बरेच लोक बोलताना आढळतात. मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, पती/पत्नी प्रेम, देशप्रेम, राष्ट्रप्रेम, विश्वप्रेम अशी अनेक प्रेमं कव्हरेज मिळवतात. पण एकाच उपप्रकारातलं प्रेम किती टप्प्याटप्प्यांनी किती प्रमाणात कमालीचं बदलतं याचा कधी धांडोळा घेतला तर हे लक्षात येईल की प्रेम ही अज्जिबात शाश्वत आणि सेक्रिड गोष्ट नाही. इंटेग्रिटी हा प्रेमातला अतिशय वरवरचा भाग आहे. (इथे सार्वजनिक जीवनात वर्षानुवर्षं एकमेकांची साथ देणाऱ्या जोडीदारांची उदाहरणं गैरलागू ठरतात.) ही इंटेग्रिटी स्वतःची. ती जेव्हा स्वतःच्या सीमा ओलांडून बाहेर जाते तेव्हा तिचं पावित्र्य किंवा या संदर्भात व्हर्जिनिटी भंग पावते. आईवडील किंवा बहीणभावाविषयीचं प्रेम हे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कमीजास्त किंवा निर्माण-नष्ट होत जातं. बालपणी ते परावलंबित्वातून आणि त्यामुळे झालेल्या सवयीतून येत असेल, समज आल्यानंतर स्वार्थ सुरक्षित करण्यातून असेल आणि प्रौढ किंवा अतिप्रौढ वयात कर्तव्य आणि जबाबदारीच्या जाणीवेतून आलेलं असेल. पण ज्यात रतिक्रीडेचा आनंद वगळला आहे ते प्रेम या प्रकारच्या कार्यकारणभावाची ओझी वाहतच असतं. त्यामुळे निष्काम कर्मयोगाप्रमाणेच निःस्वार्थ प्रेम हीसुध्दा एक आदर्श संकल्पना ठरते. कोणत्याही गोष्टीची कामना नसलेल्या माणसाला निष्काम असण्याची कामना असतेच त्याचप्रमाणे निःस्वार्थ प्रेम करणाराही अशा प्रेमातून मिळालेल्या आनंदाची अभिलाषा करत असतो. सार्वजनिक जीवनात समाजकार्यात एकमेकांची मनोभावे निःस्वार्थीपणे साथ देणाऱ्यांची ती तशी देण्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. प्रेम ही एकच गोष्ट त्यात क्रुशल नसते. आपल्या सामाजिकतेचे भान, आपल्या कार्याप्रती निष्ठा आणि ते निरंतर चालू राहावं यासाठीची तजवीज अशी अनेक कारणं त्यात असू शकतात.
सेक्स इन्व्हॉल्व्ह असलेल्या प्रेमाच्या बाबतीत इंटेग्रिटी हा शब्द जास्त वजनदार होतो. ज्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम वाटतं त्याच्याशी आपण सेक्शुअल होतो. या वाक्याला उलट केलं तर ज्या व्यक्तीशी आपण सेक्शुअल होतो तिच्याविषयी आपल्याला प्रेम वाटत असतं. हे विधान सर्वसाधारण समाजाच्या बाबतीत आणि शरीरसंबंधांचे संस्थात्मक नियमन करण्याच्या प्रक्रियेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आता हेच विधान आपण व्यक्तीच्या पातळीवर नेलं तर काय होतं ते बघू. ''मी'' ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्यासोबत ''मी'' सेक्स करतो. याउलट ''मी'' सेक्स करतो त्या मुलीवर मी प्रेम करतोच असं नाही. मग मी ज्या मुलीवर ''प्रेम'' करतो तिच्या शरीराशिवाय मला आणखी काय हवं असतं? तिचा वेळ, लक्ष्य, सुख, सद्भावना, स्तुती, मदत, आधार, समज, मार्गदर्शन, अहंचं शमन, प्रजोत्पादन इ. या सगळ्या गोष्टी कमीअधिक प्रमाणात जी मला देते तिच्यावर मी प्रेम करतो. यात कुठेही काळ या घटकाचा उल्लेख नाही. पण काळच या सगळ्या सिच्युएशनमधला सगळ्यात क्रुशल घटक आहे. वयाच्या २४ व्या वर्षी प्रेम करणारं एक कपल सेक्सशिवायच्या स्वतःच्या ज्या गरजा भागवतं तेच कपल वयाच्या ४५ व्या वर्षी त्या भागवेलच असं नाही. मी जो २४ व्या वर्षी ३४ साईझची जीन्स घालत असतो तोच मी ४५ व्या वर्षी ३८ साईझची पँट पोट दाबून अंगावर चढवत असतो. याचाच अर्थ मी बदललेला असतो आणि त्यात 'मी'चा काहीएक दोष नसतो. अशा बदललेल्या परिस्थितीत आपल्याला एकमेकांची गरज उरली नाही हे सत्य आपल्या गळ्याखाली उतरत नाही. आपण एकमेकांच्या इतके जवळचे आहोत कारण आपण इतकी वर्ष एकमेकांसोबत झोपलो आहोत. त्यामुळे आपल्याला एकमेकांची जरी गरज नसली तरी आपण एकमेकांसोबत थांबलं पाहिजे कारण डिव्होर्स घेण्याइतके आपले संबंध बिघडले नाहीत अशी एक लांबलचक कारणमीमांसा आपल्याला अवगत होते. खरंतर गरजच नसेल तर एकमेकांवर प्रेम करण्याचं काही कारणच उरत नाही. प्रेमाचं पासिंग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर लोक हे सहजासहजी विसरुन जातात की हे फक्त लायसेन्स आहे प्रत्यक्ष सवारी आपणच आहोत. प्रेम मिळवण्यासाठी जेवढी धडपड कोर्टिंगच्या काळात एखादी व्यक्ती करते तीच व्यक्ती एकदा ते प्रेम मिळून उपभोगल्यानंतर शांत होते. त्यामुळे कितीही कडू वाटलं तरी बऱ्याच कपल्समध्ये ही ''गरज सरो वैद्य मरो''ची अवस्था येते हे सत्य आहे. लग्नसंबंधात ही मानसिक गरजांची यादी ऐहिक उपभोगात रुपांतरित होते. आणि त्यासाठी तरी सहजीवन मुकाट्यानं स्वीकारलं जातं.
''लग्नाआधी तू मला रोज एक गुलाबाचं फूल द्यायचास'' किंवा ''आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी दीड तास फोनवर बोलायचो'' ही अवस्थासुध्दा पुढे सरकणाऱ्या काळाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याच्या मनःस्थितीतून येत असते. आपल्या वाढीच्या वेगाच्या समप्रमाणात आपल्या प्रेमाच्या गरजेचं सुध्दा अपग्रेडेशन करायला लागतं हे समजायला हवं. एक व्यक्ती म्हणून एकमेकांना समृध्द करु शकत नसले तरीही सगळ्या सुखदुःखात एकमेकांची साथ देण्याच्या अट्टाहासापायी एकमेकांच्या सोबत राहून आणि असमाधानानं गोंधळल्यामुळे आयुष्य नासवून टाकणारी जोडपी मी बघितली आहेत. त्यापेक्षा दूर होणं हा जास्त समजूतदारीचा आणि सर्जक उपाय ठरावा. 'Scent of a woman' नावाच्या एका अमेरिकन फिल्ममध्ये अल पचिनोच्या तोंडी एक वाक्य आहे. "I hate goodbyes". तसंच आपल्याला गुडबाईज विषयी मनात तिरस्कार असतो. आपल्या आयुष्यात असलेली पोकळी एक व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वानं जन्मभर कधीच भरून काढू शकत नाही. फार फार तर ती आपली पोकळी समजून घेऊ शकते आणि ती भरून न काढण्याचा सुज्ञ निर्णय घेऊ शकते. पण आपल्याला हट्टानं एकमेकांचे आणि स्वतःचे लाड करून घ्यायचे असतात. अट्टाहासानं दुसऱ्याचं एकटेपण घालवायचं असतं. आणि या अट्टाहासापायी दोन माणसांतलं अंतर इतक्या निर्घृणपणे वायोलेट केलं जातं की एकमेकांविषयी प्रेम वाटण्याऐवजी घृणा आणि तटस्थता निर्माण होते.
ज्या प्रकारच्या काळात आपण राहत आहोत त्यात व्यक्तीच्या स्वच्या तुटक तुटक संज्ञा एकमेकांशी एका सैल दोऱ्याने बांधल्या गेल्यासारख्या दिसतात. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारी व्यक्ती ऑफिसमध्ये सेक्युलर असते तर दिवाळीला पारंपरिक सण एन्जॉय करणारी. संघाच्या वातावरणात वाढलेला दिग्दर्शक सोशलीस्ट सी. ए. शी कॉन्ग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या प्रचारासाठी फिल्म्स बनवण्याचे मनसुबे आखत असतो. पर्यावरणावर हिरिरीनं भांडणारे एका पॉईंटनंतर प्लास्टिकच्याच पिशव्यांत प्रचाराचं सामान घेऊन जातात. हे आंतरविरोधांचे नमुने ज्याप्रमाणे दोन विरुद्ध टोकाची मतं एकत्र आल्याचं दाखवतात तसंच परस्परविरोधी नसलेली पण आपलं वेगळेपण शाबूत ठेवणारी मतंही शहरी भागात एकमेकांना जास्त त्रास न देता राहताना दिसतात. प्रेमाच्या बाबतीत हे असं न-कट्टरपंथीय धोरण लोकप्रियता पावलेलं मात्र अजून दिसत नाही. अजूनही प्रेम केलं म्हणजे ''लग्न कधी करताय'' असं विचारणारे किंवा जातीबाहेर किंवा स्टेटसमध्ये न बसणारा जोडीदार निवडला तर जीव घेणारे बाप आणि खाप अस्तित्वात आहेतच. हेटरोसेक्श्युअल असो वा होमोसेक्श्युअल, मोनोगॅमीस्ट असो वा पॉलीगॅमीस्ट "तुझं माझ्यावर प्रेम होतं, आता ते नाही आहे, त्याच्यानं काही फरक पडत नाही. जसं ते आधी नसताना एकदम झालं तसंच ते खूप जास्त असताना एकदम संपून गेलं. कदाचित थोडा वेळ दिला तर ते परत येईल. पण म्हणून मला तुला बांधून ठेवायची गरज नाही." असे उद्गार काढणारं जोडपं बघायची मला खूप इच्छा आहे.
शहरात वाहनं वापरणा-या लोकांना लेनचं महत्व वेगळं सांगायला नको. आपण ज्या लेनमधून चाललो आहोत त्या लेनचा वेग आणि आजूबाजूच्या लेन्सचा अंदाज घेऊन आपली पोझिशन आपण पाळतो. प्रेम या संकल्पनेच्या बाबतीत ही वाहतुकीच्या लॉजीकची तुलना कदाचित योग्य ठरू शकेल. प्रेम ही सतत वाहत राहणा-या वाहतुकीसारखी एक व्यवस्था असावी, ज्यात समोर खड्डा आला तरी हळूहळू ब्रेक मारावा, अन्यथा पाठीमागे असलेल्या सर्व वाहतुकीला आपण जोखमीत टाकू आणि स्वतःचाही अपघात करवून घेऊ अशा पद्धतीचं तत्त्व आपण अवलंबतो. प्रेम केलेली व्यक्ती जरी आता आपलं प्रेम आकर्षित करायला कमी पडत असली किंवा आपल्याला तिच्याविषयीचं प्रेम आता वाटत नसलं तरी आपल्या सहवासामुळे ज्या काही इतर गोष्टी परिणामानं आपल्याला मिळाल्या आहेत त्या गमावण्याच्या मनःस्थितीत आपण नसतो. यात त्या त्या व्यक्तींचे लागेबांधे, नेटवर्क, भावना, अपत्यं असतील तर त्या जबाबदाऱ्या, छोटं मोठं सुख, आर्थिक मदत इ. गोष्टी येतात.
तुम्ही दुसऱ्याला जितकं प्रेम द्याल तितकंच प्रेम तुम्हाला मिळेल या उक्तीला गांभीर्यानं घ्यायचं ठरवलं तर प्रेम ही देण्याघेण्याची वस्तू/क्रिया आहे हे मान्य करावं लागेल. अव्यक्त प्रेम किंवा प्लॅटॉनिक प्रेम हा विषय या लेखाच्या कक्षेत येत नाही. कारण तिथे प्रेम करणारा आणि मिळवणारा यांच्यात त्याप्रकारची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे उपभोग्य वस्तू/क्रिया जशी कार्य साध्य झाल्यावर निरुपयोगी ठरते तसंच प्रेमदेखील एका ठराविक काळानंतर तसं होऊ शकतं. जीवनभर पुरून उरेल असं एकमेव प्रेम मिळणं दुरापास्त असतं जसं उदाहरणार्थ आपल्याला एकच मोबाईल वापरणं अशक्य असतं. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती जशी आपल्यासाठी एक ऑप्शन असते तसेच आपणही तिच्यासाठी एक ऑप्शन असतो हे मनात स्वच्छ झालं की प्रेम टिकवण्यासाठी केला जाणारा निरर्थक आटापिटा टळेल आणि ते सहज, स्वाभाविक होऊ शकेल. त्याला जसा एक गौरवास्पद निश्चित जन्म असतो तसाच गौरवास्पद मृत्यूदेखील असेल. एरव्ही तत्त्व आणि त्याचं व्यावहारिक उपयोजन यामध्ये तफावत असते आणि त्याला आपण सचोटी म्हणतो असं सगळेच समजून असतात. पण प्रेमाविषयी आपल्याला विशुद्ध, दृढ नीती प्रमोट करायची असते. ते एक अतिशय मानवी मूल्य आहे आणि ते क्षणभंगुर असलं म्हणून काही ते कुरूप होत नाही ही गोष्ट आपल्याला आपल्या ओ. एस. (ऑपरेटिंग सिस्टीम) प्रमाणेच अपग्रेड करून घ्यायला हवी.
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

Comment viewing options

 
 
Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.
Sat, 24/11/2012 - 06:26 | 'इन प्रेज ऑफ लव्ह' (Score: 2 माहितीपूर्ण)
चिंतातुर जंतू
पुण्य: 2
Alain Badiou हे फ्रान्समधले एक महत्त्वाचे सद्यकालीन तत्त्वज्ञ मानले जातात. त्यांनी लिहिलेलं 'इन प्रेज ऑफ लव्ह' (मूळ फ्रेंच - २००९; इंग्रजी भाषांतर - २०१२) हे पुस्तक वाचावं अशी शिफारस धागालेखक वंकू कुमार आणि इतर प्रतिसादक यांना करेन. लेखकाची एक मुलाखत इथे वाचता येईल. मुलाखतीतली काही उद्धृतं :
Love is not a contract between two narcissists. It's more than that. It's a construction that compels the participants to go beyond narcissism. In order that love lasts one has to reinvent oneself.
[...]
I absolutely agree that sex needs to be freed from morality. I'm not going to speak against the freedom to experiment sexually like some old arse – un vieux connard – but when you liberate sexuality, you don't solve the problems of love.
[...]
But avoiding love's problems is just what we do in our risk-averse, commitment-phobic society. [...] Everybody wants a contract that guarantees them against risk. Love isn't like that.
[...]
You discover truth in your response to the event. Truth is a construction after the event. The example of love is the clearest. It starts with an encounter that's not calculable but afterwards you realise what it was. The same with science: you discover something unexpected – mountains on the moon, say – and afterwards there is mathematical work to give it sense. That is a process of truth because in that subjective experience there is a certain universal value. It is a truth procedure because it leads from subjective experience and chance to universal value.
- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गुरुवार, 22/11/2012 - 18:06 | लेख आवडला (Score: 1)
शहराजाद
पुण्य: 2
लेख आवडला.
प्रेम केलेली व्यक्ती जरी आता आपलं प्रेम आकर्षित करायला कमी पडत असली किंवा आपल्याला तिच्याविषयीचं प्रेम आता वाटत नसलं तरी आपल्या सहवासामुळे ज्या काही इतर गोष्टी परिणामानं आपल्याला मिळाल्या आहेत त्या गमावण्याच्या मनःस्थितीत आपण नसतो. यात त्या त्या व्यक्तींचे लागेबांधे, नेटवर्क, भावना, अपत्यं असतील तर त्या जबाबदाऱ्या, छोटं मोठं सुख, आर्थिक मदत इ. गोष्टी येतात.
तसे पाहता ही आपल्या आजूबाजूला सर्वत्र आढळणारी गोष्ट आहे. पण बर्‍याचादा जे आहे ते कबूल करायला, अगदी स्वतःशीदेखील, बहुतेकांना आवडत नाही. पण असेही आहे, की काही वेळा दोघांच्याही दृष्टीने वर उल्लेखलेल्या इतर गोष्टींची गोळाबेरीज उतरणीच्या प्रेमाने आयुष्यात झालेल्या पोकळीपेक्षा जास्त ठरते. ह्या इतर गोष्टीही गमावून पो़कळी आणखी मोठी होइल ह्या धास्तीतून हा आटापिटा होत असावा. कारण परिस्थितीनुसार, दुसरे पर्याय उपलब्ध असतील का ही अनिश्चितता असते.
आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती जशी आपल्यासाठी एक ऑप्शन असते तसेच आपणही तिच्यासाठी एक ऑप्शन असतो हे मनात स्वच्छ झालं की प्रेम टिकवण्यासाठी केला जाणारा निरर्थक आटापिटा टळेल आणि ते सहज, स्वाभाविक होऊ शकेल.
खरे आहे.
Mon, 19/11/2012 - 04:22 | आदर्श प्रेम (Score: 3 रोचक)
चिंतातुर जंतू
पुण्य: 2
>>सिनेमांमधून जे आदर्श प्रेम (जब तक सूरज चॉंद रहेगा... टाइपचं) म्हणून दाखवलं जातं/जायचं ते खरोखर अस्तित्वात नसतं. <<
बहुतांश लोक ज्याला प्रेम म्हणतात ते तसं नसेल कदाचित, पण म्हणून तेअस्तित्वातच नसतं हे विधान फार स्ट्राँग आहे. मला ते फार सिनिकलसुध्दा वाटतं.
>>ती खरं तर एक तत्कालीन मानसिक स्थिती असते.<<
प्रेम तत्कालीन असू शकतं या शक्यतेविषयी हरकत नाही. फक्त ते जेव्हा असतं तेव्हा ते तीव्रतेनं जाणवावं, पण जेव्हा ते नाहीसं झाल्याची जाणीव होते तेव्हा मात्र तीव्र दु:ख होऊ नये अशी अपेक्षा मला मानवी स्वभावाच्या वास्तवाशी फारकत घेणारी वाटते.
थोडा वेगळा दृष्टिकोन -
“People who are not in love fail to understand how an intelligent man can suffer because of a very ordinary woman. This is like being surprised that anyone should be stricken with cholera because of a creature so insignificant as the comma bacillus.”
“Like everybody who is not in love, he thought one chose the person to be loved after endless deliberations and on the basis of particular qualities or advantages.”
- मार्सेल प्रूस्त (फ्रेंच लेखक)
- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Tue, 20/11/2012 - 12:19 | उद्धृतं (Score: 1)
राजेश घासकडवी
पुण्य: 2
तुमच्या विचारांशी सहमत आहेच. तुम्ही दिलेली उद्धृतं हे माझे विचार नसून लेखात मला काय गवसलं याचा गोषवारा आहे. एवढ्या मोठ्या लेखाचा चार वाक्यात गोषवारा करताना थोडं जनरलाझेशन होणं स्वाभाविक आहे.
तत्कालिक स्थिती नष्ट झाल्याने दुःख होण्याविषयी वाद नाहीच. उलट ती नष्ट झाली तरी ती टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांच्या व्यर्थतेबद्दल मूळ लेखात टिप्पणी आहे.
गुरुवार, 22/11/2012 - 10:32 | +१ (Score: 1)
शहराजाद
पुण्य: 2
तत्कालिक स्थिती नष्ट झाल्याने दुःख होण्याविषयी वाद नाहीच. उलट ती नष्ट झाली तरी ती टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांच्या व्यर्थतेबद्दल मूळ लेखात टिप्पणी आहे.
अगदी अगदी!
Mon, 19/11/2012 - 03:06 | लाऊड थिंकिंग (Score: 1)
ऋषिकेश
पुण्य: 2
'मुक्त स्वगत' (किंवा खरंतर 'लाऊड थिंकिंग') म्हणता यावं अश्या प्रकारचा लेख.. काहिसा विस्कळीत..
वरचे आक्षेप काहि प्रमाणात योग्य असले तरी माझ्या बाबतीत ती पश्चतबुद्धी आहे. लेख वाचताना काहितरी निसटल्यासारखं वाटत होतं पण ते इतरांइतकं पकडु शकलो नाही.. तेव्हा माझ्यापुरता हा लेख आवडला.. अधिक घट्टा बांधला असता तर एक वेगळी मजा आली असती हे ही खरं..
बाकी काही इंग्रजी शब्दप्रयोग मात्र खटकले
- ऋ
-------
कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल.
Sun, 18/11/2012 - 20:46 | खूप म्हणजे खूप ईंग्रजी शब्द (Score: 1)
रामपुरी
पुण्य: 1
खूप म्हणजे खूप ईंग्रजी शब्द वापरल्याने अजिबात वाचवला नाही.. भिकार
Sun, 18/11/2012 - 00:52 | लेख (Score: 3 मार्मिक)
मुक्तसुनीत
पुण्य: 2
वर तर्काच्या अंगाने थोड्या विसंगती असल्याचं म्हण्टलं गेलं आहे ते मलाही जाणवलं पण या लिखाणाकडे एखाद्या आर्ग्युमेंटसारखं न बघता, काहीशा सैलपणे, काहीशा अस्ताव्यस्तपणे मांडलेले विचार असं बघतो आहे. तसं न पाहिल्यास मग त्याची बरीच छाननी करता येईल/करावी लागेल. सर्व संदर्भ जुळवले गेलेले नसतील, पण मला त्याचा परिणाम जाणवला खरा.
लेख आवडला. प्रेम या संदर्भातलं "कपलिंग" थोडं सैल ठेवावं असा एक सूर मला जाणवला, जो पटला. लेखातले अनेक भाग दाद द्यावेत असे वाटले.
Walking talking Shivaji fell great. Nothing of Aurangzeb's could walk in front of him and nine came to his nose.
Sun, 18/11/2012 - 01:41 | आवडले (Score: 1)
वंकू कुमार
पुण्य: 1
आवडले
Sat, 17/11/2012 - 20:42 | लेखनाचा सर्वसाधारण रोख पटला. (Score: 3 मार्मिक)
राजेश घासकडवी
पुण्य: 2
लेखनाचा सर्वसाधारण रोख पटला. मला हाती लागलेलं सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ते असं काहीसं
"सिनेमांमधून जे आदर्श प्रेम (जब तक सूरज चॉंद रहेगा... टाइपचं) म्हणून दाखवलं जातं/जायचं ते खरोखर अस्तित्वात नसतं. ती खरं तर एक तत्कालीन मानसिक स्थिती असते. अनेक वेगवेगळ्या आकर्षणांची, अनुभवांची, भावनांची गोळाबेरीज करून तयार झालेली. आपण बदलतो, समोरची व्यक्ती बदलते, नवीन अनुभव, भावनांची भर पडते त्याबरोबर हे नातंही बदलतं. तरीही अनेक लोक हे कबूल करत नाहीत. हा बदल म्हणजे जणू काही आपण केलेली दहा वर्षांपूर्वीच्या स्वशी व त्याच्या त्या मानसिक स्थितीशी केलेली प्रतारणा आहेत असं समजतात. असं करण्याऐवजी आपण बदललो, हे स्वीकारणं ही एक अपग्रेडेड जाणीव आहे"
मात्र हे शोधताना मला फार कष्ट झाले. आणि अजूनही लेखकाला हेच तंतोतंत म्हणायचं आहे याची खात्री नाही. असो.
प्रेम म्हणजे काय यावर मात्र लेखात काही ऊहापोह नाही. ते काहीतरी असतं, आणि गरम वस्तूला हात लावल्यावर चटका लागतो त्याप्रमाणे सगळ्यांनाच ते एका पद्धतीने प्रतीत होतं असं काहीसं साधारणपणे चित्र असतं. प्रेमात असणं किंवा नसणं हे गरोदर असण्यानसण्याप्रमाणे काहीतरी काळंपांढरं वाटतं. ते खरं तर तसं नाही. बहुतेकांच्या प्रेमभावनेच्या तीव्रतेचा नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन कर्व्ह असतो. त्यातल्या कुठच्यातरी टोकाच्या भावना असलेल्यांच्या कथा सिनेमांत दाखवतात. त्यामुळे चिंतातुर जंतूंचा आक्षेप लागू होतो.
मला वाटतं की लेखकाला तो आक्षेप मान्यच आहे आणि 'आधीच या कल्पना स्वच्छ असल्या तर ते प्रेमही काहीतरी आदर्श आणि अवास्तव बनण्याऐवजी जीवनातल्या इतर गोष्टींप्रमाणेच बनतं, आणि तसंच असावं' असं काहीसं लेखकाला मांडायचं आहे.
Sun, 18/11/2012 - 02:05 | प्रतिक्रिया आवडली. तुम्हाला (Score: 1)
वंकू कुमार
पुण्य: 1
प्रतिक्रिया आवडली. तुम्हाला जे सापडलं आहे ते योग्यच सापडलं आहे. प्रेम या संकल्पनेवर (मी बरोबर रीड केले असेल तर प्रेमाच्या व्याख्येवर ) मी काही भाष्य केले नाही हे तुमचे मत बरोबर आहे. प्रेमाविषयी तुम्ही म्हणता तसं काळं / पांढरं ठोस असं काही सांगता येत नाही. त्याचा नेमकेपणा त्याच्या नकळण्यात आहे असं मला वाटतं. ले़खातल्या पहिल्याच परिच्छेदात मी हे स्पष्ट केलं आहे की प्रेमाची व्या़ख्या करता येत नाही. पण ते असतं यात मात्र शंका नाही.
Sat, 17/11/2012 - 05:41 | तार्किक गोंधळ जाणवला (Score: 1)
चिंतातुर जंतू
पुण्य: 2
>>ज्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम वाटतं त्याच्याशी आपण सेक्शुअल होतो. या वाक्याला उलट केलं तर ज्या व्यक्तीशी आपण सेक्शुअल होतो तिच्याविषयी आपल्याला प्रेम वाटत असतं.<<
शारीरिक आकर्षण आणि प्रेम यांत गल्लत करण्यामुळे अनेक गोंधळ होत असावेत. 'तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे' म्हणणारे जय-वीरूसुध्दा बहुधा एकमेकांवर प्रेम करत असावेत, आणि अशा मैत्रीत मित्राच्या ताटातुटीचं (इथे मृत्यूमुळे) दु:खही होत असणार.
शरीरसंबंध बाजूला ठेवले तर असं दिसेल की पराकोटीचं प्रेम (म्हणजे 'तोडेंगे दम मगर...'वालं) एकाच वेळी पुष्कळ लोकांबद्दल ज्यांना वाटू शकतं अशा व्यक्ती विरळा असतात. त्यामुळे, म्हणजे ह्या प्रेमाच्या अनन्यतेमुळे किंवा दुर्लभतेमुळे तशा प्रेमाला काहीएक मूल्य येतं. पण मग प्रेम खरंच त्या ताकदीचं असलं तर काही काळानंतर तुम्ही म्हणताय तसं "तुझं माझ्यावर प्रेम होतं, आता ते नाही आहे, त्याच्यानं काही फरक पडत नाही." असा उदारमतवाददेखील फार थोड्या लोकांमध्येच असणं साहजिक वाटतं. त्यामुळे अशी जोडपी असलीच तर ती दुर्मिळच असणार; नाहीतर 'मुळातच त्यांचं प्रेम इतकं ऑब्सेसिव्ह नसेल कदाचित', असा निष्कर्ष काढता येईल. त्यामुळे तुमची ही अपेक्षा काहीशी अवास्तव वाटते.
'तुम्ही दुसऱ्याला जितकं प्रेम द्याल तितकंच प्रेम तुम्हाला मिळेल' ह्या उक्तीतही काही अर्थ नाही. पुष्कळदा प्रेम हे पूर्णतः एकतर्फी असतं. जेव्हा ते तसं नसतं तेव्हादेखील तीव्रता दोहो बाजूंनी सारखी नसण्याची शक्यता अधिक असते.
>>आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती जशी आपल्यासाठी एक ऑप्शन असते तसेच आपणही तिच्यासाठी एक ऑप्शन असतो हे मनात स्वच्छ झालं की<<
जर हे सुरुवातीपासून स्वच्छ असेल तर ते प्रेमही 'तोडेंगे दम..' वालं नसेल, कारण एका ऑप्शनसाठी कोण आपला जीव घालवेल? आणि मग जर ते एका ऑप्शनपुरतंच असेल तर ते फारसं गौरवास्पदही का असावं? कारण तसं प्रेम तर एकाच वेळी पुष्कळ मित्र-मैत्रिणींवर केलं जातं त्यासारखंच, म्हणजे चांगलंच सहज उपलब्ध असलेलं असेल. आणि अशी मैत्री तुटते तेव्हाही पुष्कळशा लोकांना वाईट वाटतंच, कारण ती मैत्री जर मूल्यवान असेल तर ती तुटण्याचं दु:खही होणार. एखादा संतत्वाला पोहोचलेला माणूसच ते शांतपणे घेऊ शकेल.
- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Tue, 20/11/2012 - 02:39 | फारसे पटले नाही (Score: 4 विनोदी)
'न'वी बाजू
पुण्य: 2
शारीरिक आकर्षण आणि प्रेम यांत गल्लत करण्यामुळे अनेक गोंधळ होत असावेत. 'तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे' म्हणणारे जय-वीरूसुध्दा बहुधा एकमेकांवर प्रेम करत असावेत, आणि अशा मैत्रीत मित्राच्या ताटातुटीचं (इथे मृत्यूमुळे) दु:खही होत असणार.
हो निश्चितच प्रेम करत असावेत. आणि जयच्या मृत्यूमुळे वीरुस दु:ख झालेलेही स्वयंस्पष्ट आहे. पण...
शरीरसंबंध बाजूला ठेवले तर असं दिसेल की पराकोटीचं प्रेम (म्हणजे 'तोडेंगे दम मगर...'वालं) एकाच वेळी पुष्कळ लोकांबद्दल ज्यांना वाटू शकतं अशा व्यक्ती विरळा असतात.
यात (बोले तो, 'तोडेंगे दम मगर'वाल्या प्रेमाच्या या विशिष्ट आविष्कारात)शारीरिक आकर्षणाचा, शरीरसंबंधाचा भाग नाही, असे खात्रीसहित, छातीठोकपणे सांगू शकाल काय? अशा गृहीतकास आधार काय, ते समजून घ्यावयास आवडेल.
(उलटपक्षी, यात शारीरिक आकर्षणाचा, शरीरसंबंधाचा भाग आहे, असे छातीठोकपणे विधान करण्याकरिता माझ्याकडेही कोणताही आधार नाही.(दोघेही एकाच तुरुंगात एकाच वेळी दीर्घकाळाकरिता एकत्र होते, या बाबीतून, आणि/किंवा त्या दोघांच्या प्रादेशिकतेच्या अनुषंगाने प्रचलित असलेल्या कोणत्याही समकालीन आणि/किंवा प्राचीन स्टीरियोटाइपांतून, काहीही सिद्ध होऊ नये. असा कोणताही निष्कर्ष हा तर्काधिष्ठित निष्कर्ष नव्हे, तर सीता-रावण-संबंधातल्यासारखी धोबीछाप अटकळ व्हावी फार फार तर. तर ते एक असो.) तर सांगण्याचा मुद्दा, ठोस आधाराअभावी, वरील उदाहरणात शारीरिक आकर्षणाचा / शरीरसंबंधाचा भाग आहे, असे प्रतिपादन निदान मी तरी करत नाही. त्या ब्याकड्रापावर, यात शारीरिक आकर्षणाचा / शरीरसंबंधाचा भाग नाही, या आपल्या प्रतिपादनामागील आधाराबाबत कुतूहल आहे.)
आणि असे पराकोटीचे (बोले तो, "तोडेंगे दम मगर" छापाचे) प्रेम एकाच वेळी पुष्कळ जणांवाचून वाटू शकणार्‍या व्यक्ती विरळा असतात, असे कोण म्हणते? आपल्या वीरूचेच पहा ना! एकीकडे तो वीरूवर "तोडेंगे दम मगर" छापाचे प्रेम करतो खरे. पण दुसरीकडे तो पाण्याच्या टाकीवर 'सुसाट' करायला म्हणून चढतो, तो जर त्याचे बसंतीवर "तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे" छापाचे प्रेम नसते, तर काय त्याला बसंती दोनचार घटकांपुरती एखादा पत्त्यांचा डाव टाकायला हवी असते म्हणून?
आता हा वीरू काय 'विरळा' क्याटेगरीत मोडतो?
दुसरा तो जय. एकीकडे वीरूवर जिवापाड प्रेम करतो. दुसरीकडे त्या राधावरही प्रेम करत असतो, तिच्याशी लग्नाचा विचार करत असतो, तो तिची मरेपर्यंत साथ न सोडण्याच्या निश्चयाने नाही, तर काय दोनचार दिवसांनी तिला सोडून देण्याच्या इराद्याने?
तिसरी ती बसंती. एकीकडे वीरूवरही प्रेम करते, आणि दुसरीकडे त्या धन्नोवरही. पुढेमागे यांपैकी नेमक्या कोणाला सोडून जायचा तिचा विचार असतो, हे कळू शकले नाही.
आता एकट्या 'शोले'तच, एकाच वेळी पराकोटीचे ('शेवटच्या श्वासापर्यंत साथ सोडणार नाही'छाप) असे प्रेम अनेक जणांबाद्दल वाटू शकणार्‍या व्यक्तींची किमान तीन उदाहरणे आपल्याला सापडली. (धन्नोची मते नक्की समजू न शकल्याकारणाने तीस जमेस धरलेले नाही.) या दराने, एक्ष्ट्रापोलेट केल्यास, समाजात अशी कित्येक उदाहरणे सापडण्यास प्रत्यवाय नसावा. आता हा नेमक्या कोणत्या निकषाने 'विरळा' प्रकार होतो बुवा?
Fri, 16/11/2012 - 10:57 | कठीण (Score: 2 रोचक)
मृदुला
पुण्य: 1
एकूण कठीण आणि गुंतागुंतीचा वाटला हा लेख. मूळ मुद्दा काय असावा हा विचार करते आहे.
>>नसताना एकदम झालं तसंच ते खूप जास्त असताना एकदम संपून गेलं.
हे लॉजिकल वाटले नाही. नसताना एकदम झालं हे ठीक. पण असताना संपण्यासाठी प्रेम ही किलोत किंवा लीटरात मोजायची बाब नाही. (स्माईल) भावना आहे. २४ ते ४५ मध्ये माणूस बदलतो तसेच प्रेम बदलेल, फारतर राग, तिरस्कार, वैताग, किंवा माया वगैरे शिल्लक राहील. पण एकदम काहीच भावना उरणार नाही हे पटले नाही.
Sun, 18/11/2012 - 01:39 | माझा उत्साह सम्पला किंवा (Score: 1)
वंकू कुमार
पुण्य: 1
माझा उत्साह सम्पला किंवा इच्छा गेली असं आपण म्हणतो तेव्हा वजनाची किंवा अंतराची मापं आपल्या डोक्यात येत नाहीत. "नसताना एकदम झालं तसंच ते खूप जास्त असताना एकदम संपून गेलं" असं म्हटल्यावर ती भावना आता राहिली नाहीय असंच आपण समजतो. बालपणी आपल्या मि॑त्रांबरोबर आपण सगळेच खेळतो. त्यांच्याविशयी आपल्याला प्रेम वाटते. पण अनेकदा एखादा बालमित्र आपल्याला खूप वर्षांनी भेटतो आणि आपल्याला त्याच्याविषयी तितके प्रेम वाटत नाही. आपल्या मनात काहीच भावना नसतात असे होत नाही. पण तितके प्रेम राहत नाही.
Wed, 14/11/2012 - 04:31 | हम्म (Score: 1 उपेक्षित)
जाई
पुण्य: 1
प्रेमा तुझा रंग कसा
Wed, 14/11/2012 - 03:59 | प्रेम 'अपग्रेड' करत (Score: 2)
आतिवास
पुण्य: 2
प्रेम 'अपग्रेड' करत राहण्यासाठी स्वतःवर प्रचंड प्रेम असावं लागतं.
ते असलं, तरीही काही प्रश्न येतात समोर.
ते नसलं, तरीही काही दुसरे प्रश्न येतातच समोर.
एकूण प्रश्नांना पर्याय नाही.
प्रेमाचं अपग्रेडेशन केलं तरी नवं प्रेम अपग्रेडेड मिळणार की नाही ही शंका घेऊन जगायची तयारी हवी. लो ग्रेडचं मिळालं, तर त्याचीही तयारी हवी. अन नाही मिळालं तरीही.
मानवी जीवनच क्षणभंगूर आहे असं म्हणतात, पण प्रत्यक्षात "ते काही क्षण" बराच काळ टिकतात हीच गंमत आहे. त्यामुळे क्षणभंगूरतेचा केलेला हिशोब चुकण्याला तसा पर्याय नसतो.
दृष्टिकोन म्हणून विचार पटले.
त्यात छुपा 'उपयुक्ततावाद' असेल तर मात्र माझी सहमती क्षणभंगूर समजावी (स्माईल)
Wed, 14/11/2012 - 02:33 | या लेखातील मतांशी कोणी सहमत (Score: 1)
वंकू कुमार
पुण्य: 1
या लेखातील मतांशी कोणी सहमत किंवा असहमत आहे का ?
Wed, 14/11/2012 - 03:05 | दीर्घ प्रतिसाद लिहावा लागेल. (Score: 2)
चिंतातुर जंतू
पुण्य: 2
(स्माईल) दीर्घ प्रतिसाद लिहावा लागेल. जमेल तेव्हा लिहीन.

No comments: